पुण्यातील मुळशी तालुका भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, 500 मीटर जमीन दुभंगली

पुणे : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. अशातच पुणे  जिल्ह्यातील मुळशीमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणावले आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे तब्बल 500 मीटर लांब जमीन दुभंगली आहे.  खबरदारी म्हणून ग्रामस्थांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

मुळशी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने धुमशान घातले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंप धक्के सृदृश परिस्थितीत पाहण्यास मिळाली. यामुळे माळीण सारखी भूस्खलन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 12 जुलैपासून साधारणत: पाचशे मीटर लांब अशी भेग पडलेली असून भेगेची टाटा तलावाकडील जमीन साधारणत: एक ते दीड फूट खाली खचलेली आहे.

वाघवाडीत माळीण सारखी भूस्खलन सदृश्य स्थिती असून 12 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सर्व गावकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवले आहे. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण गटविकास अधिकारी संदिप जठार यांची घटनास्थळी पाहणी केली. जमीन खचण्याचे प्रमाण वाढत आहे. दोन्ही गावामधील नागरिकांना तातडीने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही गावातील जमीन ही टाटा धरणाच्या हद्दीत येते त्यामुळे अनेक दिवसांपासून गावकऱ्यांचा जमिनीसाठी लढा सुरू आहे. आता पावसाळ्यात जमीन खचल्यामुळे गावकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संपूर्ण परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाची संततधार सुरू आहे. सर्व गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले असून प्रशासन घटनेवर लक्ष ठेवून आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply