पुणे : वानवडीतून अपहरण झालेल्या उच्चशिक्षित तरुणाची तळेगाव दाभाडे परिसरातून सुटका; चौघे गजाआड

पुणे : आर्थिक व्यवहारातून उच्चशिक्षित तरुणाचे वानवडी भागातून अपहरण करून त्याच्या पत्नीकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांनी कारवाई करून अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची सुटका केली.

दत्तात्रय श्रीराम वारिंगे (वय ३९), महेश ब्रह्मदेव जाधव (वय ३२), सुभाष गोपाळ साेनजारी (वय ४०), रवी हनुमंत अंकुशी (वय ३४, चौघे रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अपहरण करण्यात आलेला तरुण उच्चशिक्षित आहे. आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. आरोपी आणि तरुणात आर्थिक व्यवहार झाला होता. आरोपींनी वानवडीतील फातिमानगर चौकातून तरुणाचे गुरुवारी रात्री अपहरण केले. त्याच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून आरोपींनी आठ लाख रुपयांची खंडणी मागितली.

गुन्हे शाखा आणि वानवडी पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. आरोपींना खंडणीची रक्कम देण्यासाठी तळेगाव दाभाडेतील शिवाजी चौकात बाेलाविले. साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने तेथे सापला लावला होता. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. या परिसरातील एका खोलीत डांबून ठेवलेल्या तरुणाची पोलिसांनी सुटका केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, अमाेल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, संदीप शिवले, सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, अजय शितोळे, अतुल गायकवाड आदींनी ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *