पुणे : राज्यातील तापमानाचा पारा आणखी खाली उतरणार

पुणे : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने शनिवार आणि रविवारी राज्यात तापमानाचा पारा खाली गेला आहे. पुढील चार ते पाच दिवस हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना थंडीची प्रतीक्षा करण्यात गेल्यानंतर आता नव्या वर्षात नागरिकांना हिवाळा अनुभवण्यास मिळेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेले काही दिवस उत्तर भारतात थंडीची लाट मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम ओरिसा, आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी आणि दाट धुके पसरले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात थंडी आणि धुक्याची परिस्थिती कायम राहणार आहे, तसेच इतर राज्यांतही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम राजस्थानच्या वायव्येकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही पुढील किमान पाच दिवस थंडी पडेल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेकडे सरकल्यामुळे या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात किमान तापमान सरासरीच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply