पुणे : मोसमी पाऊस माघारी ; राज्यात परतीचा पाऊस १०२ टक्के अधिक ; मुंबई उपनगर, नगर जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून रविवारी (२३ ऑक्टोबर) माघारी गेल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. सर्वसाधारण वेळेपेक्षा आठ दिवस उशिरा आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवस आधी यंदा मोसमी वारे देशातून परत फिरले. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. राज्याच्या ९० टक्के भागामध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. देशातील सर्वाधिक परतीचा पाऊस दिल्लीमध्ये झाला असून, सरासरीच्या तुलनेत तो चौपट ठरला.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामाच्या कालावधीत राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत २४ टक्के अधिक पावसाची नोंद जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होऊन राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी पूर्ण केली. हंगामाचा कालावधी संपल्यानंतर मात्र ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात राज्यातच नव्हे, तर देशाच्या विविध भागांत धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सर्वाधित १३३ टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला. शहर आणि जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद यंदा नगर जिल्ह्यात १९७ टक्के अधिक, तर मुंबई उपनगरांमध्ये १९४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. ठाणे, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, नंदुरबार, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाण्यात दुपटीहून अधिक पाऊस झाला.

उत्तर भारतातही परतीच्या पावसाने कहर केला. सर्वाधिक पाऊस राजधानी दिल्लीत सरासरीपेक्षा ४६९ टक्के अधिक झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आदी राज्यांतही सरासरीपेक्षा ३०० ते ४०० टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागांतही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. १ ऑक्टोबरपासून देशात सरासरीपेक्षा ६५ टक्के अधिक पाऊस झाला.मोसमी वाऱ्यांचे १४८ दिवस..

देशात यंदा २९ मे रोजी केरळमार्गे र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला होता. १० जूनला ते तळकोकणमार्गे महाराष्ट्रात सक्रिय झाले. १५ ऑक्टोबपर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर उत्तरेकडे प्रवास करीत मोसमी वारे २ जुलैला देशव्यापी झाले होते. त्यानंतर २० सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागांतून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. भारताच्या विविध भागांतून परत फिरत मोसमी वारे १४ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघाले. त्यानंतर २३ ऑक्टोबरला संपर्ण महाराष्ट्रासह देशातून ते माघारी गेले. यंदा देशातील हा त्यांचा प्रवास १४८ दिवसांचा ठरला. मोसमी वारे नियोजित वेळपेक्षा आठ दिवस उशिरा, पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत देशातून ते लवकर माघारी गेले. २०२१ मध्ये २५ ऑक्टोबर, तर २०२० मध्ये २८ ऑक्टोबरला मोसमी वारे देशातून माघारी गेले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *