पुणे : माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना; विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

पुणे : माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत आरोग्यसंपन्न भारताकरिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे पुण्यामध्ये आगमन झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थोरात, मारुती महाराज कोकाटे, बाळासाहेब वांजळे, योगेश गोंधळे यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.

यावेळी महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले की, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. कोविड संकटापूर्वी सलग दोन वर्षे अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. यंदा तिसऱ्या वर्षी गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेत असतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजेसाठी येणार आहेत : गहिनीनाथ महाराज औसेकर

दरम्यान, करोना महामारीमुळे आषाढीवारी आपल्याला सर्वांना शासनाच्या नियमानुसार करावी लागली. पण आता करोना रूग्णसंख्या आटोक्यात आहे. त्यामुळे यंदा आपण त्याच जयघोषात विठुरायाची वारी साजरी करणार आहोत, तर आळंदी आणि देहू येथून पंढरपूर दिशेने विठुरायाच दर्शन घेण्यास दोन वर्षानंतर प्रथमच वारीच्या माध्यमातुन भाविक येणार आहेत. यंदाची संख्या ही जवळपास 10 ते 12 लाख असेल अशी शक्यता आहे. त्याच बरोबर आतापासून भाविक पंढरपूरमध्ये दर्शनाला येण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत असून ती समाधानाची बाब आहे.

दोन वर्षे वारी न झाल्याने, आता येणार्‍या भाविकांसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज आहे. त्या दृष्टीने ठिकठिकाणी उपाय योजना केल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः राज्य सरकार मार्फत भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांचे आभारी आहे. त्याच बरोबर आषाढीवारीमध्ये नियमाप्रमाणे आजवर मुख्यमंत्री यांच्याहस्ते शासकीय पूजा होत आली आहे. पण करोना महामारीमध्ये देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः वाहन चालवित पंढरपूरमध्ये येऊन पूजा केली.या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत आणि यंदा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजेसाठी येणार असल्याचे पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *