पुणे :‘ बीआरटी’ला आमदारांचा विरोध; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला भाजप आमदाराचा पाठिंबा

पुणे : सार्वजनिक वाहतूक गतिमान व्हावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात विकसित करण्यात आलेल्या बीआरटी मार्ग लोकप्रतिनिधींनाच नको वाटत आहेत. त्यामुळे बीआरटी मार्ग काढा, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश द्यावा आणि वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली.दरम्यान, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या दोन्ही आमदारांना विधिमंडळात देण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असली, तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका शहरातील वाहतूक कोंडीचे खापर बीआरटी मार्गावर फोडण्यात येत आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल, तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला महिन्यापूर्वी पाठविले होते. त्यानंतर बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश द्यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्याबाबतचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला.

नगर रस्ता आणि विश्रांतवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे हा मार्ग काढून वाहतूक कोंडीची समस्या सोडवा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत केली. नगर रस्ता परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, मॉल, आयटी, विमानतळ यामुळे नगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला अपुरा पडत आहे. त्यामुळे आता बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. पोलिसांनीही हा मार्ग काढण्याची सूचना महापालिकेला केली असून महापालिकाही सकारात्मक आहे, असे टिंगरे यांनी सांगितले.

आमदार सुनील टिंगरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही सहभाग नोंदविला. प्रशासन जर बीआरटी बंद करत नसेल, तर खासगी वाहनांना शुल्क आकारून बीआरटी मार्गावरून जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिरोळे यांनी केली.बीआरटी मार्गावर पाच मिनिटांच्या वारंवारितेने गाड्यांचे संचलन होत नाही. दोन गाड्यांच्या वेळापत्रकामध्येही अंतर आहे. त्यामुळे संगमवाडी बीआरटी मार्ग, हडपसर बीआरटी मार्ग, कात्रज बीआरटी मार्ग या मार्गांवर खासगी वाहनांना परवानगी दिली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे शिरोळे यांनी सांगितले.

बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण करा, त्यांचे पुनरुज्जीवन करा, अशी मागणी सातत्याने प्रवासी संघटना आणि वाहतूक तज्ज्ञांकडून केली जात आहे. मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी महापालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून होत आहे. कोट्यवधींच्या उधळपट्टींनंतरही बीआरटी मार्गांची रडकथा कायम आहे. सध्या बीआरटी मार्ग मृत्युशय्येवर असल्याची वस्तुस्थिती आहे. खासगी वाहनांची संख्या नियंत्रणात राहावी, यासाठी बीआरटी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. मात्र त्याच्या परस्परविरोधी भूमिका लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षानेच महापालिकेच्या अंदाजपत्रकात शंभर किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गाचे जाळे प्रस्तावित केले असून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply