दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस?, मुंबईत ढगाळलेले वातावरण

मुंबईत बुधवारी ढगाळलेले वातावरण होते. पुढील तीन दिवस मुंबईत ढगाळलेले वातावरण असेल, तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पावसाचा प्रभाव या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कायम राहील. विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी किमान तापमानाचा पारा चढा आहे. पावसाळी वातावरणामुळे कुलाबा येथे २६.५ तर सांताक्रूझ येथे २५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान बुधवारी नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.३ आणि १.५ अंशांनी अधिक होते. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर कुलाबा येथे कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, सांताक्रूझ येथे कमाल तापमानात मंगळवारपेक्षा १.५ अंशांची वाढ होऊन ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सापेक्षा आर्द्रता ८० टक्के होती, तर सांताक्रूझ येथे ६३ टक्के होती. येत्या शनिवारपर्यंत मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अनुभव येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी मुंबईसोबतच डहाणू आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे होते. रत्नागिरीमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक नोंदले गेले. रत्नागिरी येथील कमाल तापमानामध्ये गुरुवारी किचिंत घट होण्याची शक्यता आहे. गुरुवार ते शनिवार या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही अधिक असेल. सिंधुदुर्गामध्येही रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार शुक्रवारी, तर डहाणू येथे गुरुवारी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे आठवडाअखेरीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पुण्यातही गुरुवार ते शनिवार आणि अहमदनग येथे गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. नाशिक येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड, लातूरमध्ये शनिवारपर्यंत तर उस्मानाबादमध्ये रविवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गुरुवारी तसेच शुक्रवारी हलका पाऊस पडू शकतो. गडचिरोलीमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळामध्ये वाढलेल्या तापमानाच्या प्रभावाखाली राज्यात मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती असते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. पश्चिमी प्रकोपाच्या परिणामामुळे मध्य भारतात वाऱ्यांची दिशा बदलत असून त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस असे असेल असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले. विदर्भात उष्णतेच्या लहरीमुळे कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहे. ब्रह्मपुरी येथे बुधवारी सरासरीहून ४.४ अंशांनी अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ४५.३ तर चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. अकोला, अमरावती, गोंदिया, वर्धा या केंद्रांवर ४४ हून अधिक कमाल तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात नांदेड येथे ४२.२ तर परभणी येथे ४३, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे ४३.४, जेऊर येथे ४२, मालेगाव आणि सोलापूर येथे ४३ तर तर सांगली येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply