गोपनीय अहवाल : ३ मे नंतर राज्यात निर्माण होऊ शकते विस्फोटक स्थिती; गृहखातं अलर्ट

मुंबई: राज्यात ३ मे नंतर विस्फोटक स्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांच्या गोपनीय अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे चं अल्टिमेटम दिलंय. त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल बनवण्यात आलाय. त्यामुळे, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गृह खात्यानं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत गृहमंंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलंय.

महाराष्ट्र पोलिसांच्या गोपनीय अहवालानुसार राज्यात अशांतता निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस सज्ज असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री म्हणाले. तसेच केंद्र सरकार दोषींना सुरक्षा पुरवतंय असा आरोप त्यांनी करत हा राज्याच्या अधिकारांवर गदा आहे असा टोला वळसे-पाटलांनी लगावला आहे. उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांची बैठक: मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे चं अल्टिमेटम दिल्यानंतर मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आज राज्याचे डीजीपी आणि सर्व आयुक्त तसंच आयजी रेंज अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना भोंगा आणि स्पिकरबाबतचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले होते. यापार्श्वभूमीवर ही बैठक होतेय.

अमरावतीमधील हिंसाचाराबाबत पालकंमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, झेंडा लावण्यावरून हा वाद झाला. ज्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे तो भाजपचा कार्यकर्ता ताब्यात घेण्यात आला आहे. भाजप अमरावतीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सध्या घडत असलेल्या घटना पाहता दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजप हे सगळं करत आहे. अचलपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस संपूर्ण चौकशी करत आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं म्हणत अमरावतीकरांना शांतता पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अमरावतीमध्ये काही घटना घडतात याचा अर्थ त्या ठिकाणी काही असामाजिक तत्वं तिथे काम करत आहेत, त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज आहे असं गृहमंत्री म्हणाले. आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीत भावना भडकविण्यासंदर्भात प्रयत्न होतोय, अशांतता निर्माण केली जात आहे. इतर प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय अस आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply