औरंगाबाद मधील जीआयएस सर्व्हेमुळे वाचले महापालिकेचे १२ कोटी

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानामार्फत शहराचा जीआयएस (ज्योग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टम) प्रणालीद्वारे सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेचा फायदा आता शहराचा विकास आराखडा तयार करताना होत आहे. महापालिकेचे तब्बल १२ कोटी रुपये यामुळे वाचले आहेत. महापालिकेतर्फे पुढील २० वर्षांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक रजा खान यांच्या नेतृत्वाखाली डीपी युनिट काम करत आहे. लवकरच शहराचा विद्यमान भूवापर नकाशा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आराखडा तयार करताना शहराच्या भौगोलिक माहितीचा सर्व्हे केला जातो. दरम्यान औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने यापूर्वीच शहराचा जीआयएस सर्व्हे केला आहे. या सर्व्हेचा फायदा विकास आराखडा तयार करण्यासाठी होत आहे. शहरातील मालमत्ता व संपत्तीची नोंद घेण्यासाठी, मालकीहक्क निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेरा, सॅटेलाइटचा वापर करण्यात आला. सध्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. दरम्यान नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद येथून सॅटेलाइट नकाशा प्राप्त झाला आहे.या दोन तंत्रज्ञानाद्वारे मिळवण्यात आलेल्या माहितीतून ग्राउंड कंट्रोल पॉइंट्स काढून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये शहरातील प्रशासकीय क्षेत्र, झोनच्या सीमा, वाहतूक नेटवर्क, भौगोलिक परिस्थिती सिटी सर्व्हे नंबर, पाणी, ड्रेनेज, विद्युत खांब या माहितीचा देखील समावेश आहे. याचा फायदा शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी होणार आहे, अशी माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली. विकास आराखड्यासाठी असा सर्व्हे करायचा झाल्यास महापालिकेला किमान १२ कोटी रुपये लागले असते. पण हा खर्च वाचला आहे, असे फैज यांनी सांगितले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply