ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यावर अंधारेंनी BMC अधिकाऱ्यांना फटकारलं; म्हणाल्या, “ राजकारण करण्यात रस असेल तर, त्यांनी पक्षाचे अधिकृत सदस्यपद घ्यावे,”

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा पालिकेकडून मंजूर करण्यात आला नव्हता. त्याविरोधात लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात आता राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “भारतीय संविधानाची एक चौकट आहे. त्यात एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करु नये, असं सांगितलं आहे. मात्र, यानुसार महापालिका कुठे काम करते, हे त्यांनी तपासून पहावे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मैदान मिळू नये, म्हणून महापालिकेने राजकारण केले. महापालिका अधिकाऱ्यांना राजकारण करण्यात रस असेल तर, त्यांनी पक्षाचे अधिकृत सदस्यपद घ्यावे,” अशा शब्दांत अंधारेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.

“प्रशासनात राहून जर राजकारण करत असाल, तर हे अत्यंत वाईट असून ते अपेक्षित नाही. मात्र, पुन्हा एकदा पालिकेचा दुट्टपीपणा, राजकीय खेळ्या लोकांच्या लक्षात आणून दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले पाहिजे. शिवसेनेचा प्लॅन ए आणि बी काही नसते. शिवसेना उघडे स्वयंपाकघर आहे, जे शिजते ते दिसते. आम्ही थेट भिडणारी लोक आहोत,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *