इंदूर-पुणे बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली, १२ प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

धार: मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. प्रवाशांना घेऊन निघालेली बस खालघाट पुलाचे कठडे तोडून १०० फूट उंचावरून नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला.

या अपघातात  १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ९ जणांचे मृतदेह वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नदीतील खोल पाण्यात बस बुडाली आहे. त्यामुळे या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, हे सांगणे आतातरी कठीण आहे, असेही तेथील यंत्रणेने सांगितले.

अपघातग्रस्त बस ही इंदूरहून पुण्याकडे येत होती. त्यावेळी पुलाचे कठडे तोडून १०० फुटांवरून ती नर्मदा नदीत कोसळली. नदीतून बस काढण्यासाठी सर्व यंत्रणा आणण्यात आली आहे, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, एसडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले आहे. इंदूर आणि धारहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *