“आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना?,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंना विचारणा, म्हणाले “त्यांचं योगदान काय?”

शिवसेना उभी करण्यात आदित्य ठाकरेंचं काय योगदान आहे? अशी विचारणा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले असून आपल्याला आणि मुलाला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.

“आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना?”

“तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? आदित्य ठाकरेंना आपलं सोडून इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या यात्रा निघत आहेत, मातोश्री व शिवसेनेचे दरवाजे उघडले असून सर्वांना भेटत आहात. हेच जर तीन वर्ष केलं असतं तर ही वेळ आली नसती,” असंही ते म्हणाले.

“तुमच्या आदित्यचं योगदान काय?”

“मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती, तर मग त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली तेदेखील सांगा. नवीन शिवसैनिक तुमच्या भावनात्मक गोष्टींमध्ये अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिक वारले, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर ही शिवसेना उभी राहिली. तुमच्या आदित्यचं योगदान काय? ते आमदार, खासदारांना पाहतदेखील नाहीत. मी प्लास्टिकबंदी केली आणि आपणच केली असं ते सभागृहात सांगत होते,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही”

“उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे असा मला संशय आहे.  नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो, मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? असा प्रश्न मला पडला आहे,” असं रामदास कदम म्हणाले.

“कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या”

“उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते,” असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. “रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात,” असंही ते म्हणाले.

“तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला नाही तर कोकणातील शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदमला पाडून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?,” अशी विचारणाही रामदास कदम यांनी केली.

“उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणणार नाही”

“मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

“आमदार, खासदार, नगरसेवक का जातात याचं आत्मपरीक्षण करा. शिवसैनिकांना भावनात्मक पद्दतीने ब्लॅकमेल करायचं काम सुरु आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती,” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply