विधान परिषद निवडणूक: विजय मिळवल्यानंतर प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “रोज सकाळी बोलणारा पोपट आता…”

विधान परिषद निवडणुकीतही राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे चमत्कार घडवून आणला आणि भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड जिंकून आले आहेत. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना लाड यांनी थेट शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊतांना म्हणाले पोपट…
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये १० जागांसाठी ११ उमेदवार असताना १० व्या जागेवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील एखाद्या पक्षाचा संघर्ष पहायला मिळेल अशी शक्यता होती. मात्र तसं न होता, दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला. भाई जगताप यांच्याआधीच प्रसाद लाड निवडून आल्याने भाजपाच्या पाच उमेदवारांनी पहिल्या नऊ जागांपैकी पाच जागा जिंकल्या. पाचवे उमेदवार असणाऱ्या लाड यांनी विजयानंतर संजय राऊत यांना ‘पोपट’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनाही सल्ला दिलाय.

मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला…
“आजचा निकाल बरंच काही सांगून जाणार आहे. भाजपाला यावेळेस राज्यसभेपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. मला शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षाही जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल,” असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आता तरी लक्षात येईल की या पोपटाचा गळा दाबला पाहिजे नाहीतर असा घात होतो,” असा खोचक सल्लाही लाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच पुढे बोलताना, “अकेला देवेंद्र क्या कर सकता है विचारणाऱ्यांना देवेंद्रजींची जादू पुन्हा एकदा पहायला मिळाली,” असंही लाड म्हणाले.

काँग्रेस विरुद्द काँग्रेस
दहाव्या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, उलटेच झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाली़  काँग्रेसने हंडोरे यांच्यासाठी पहिल्या पसंतीच्या २९ मतांची व्यवस्था केली होती. परंतु, हंडोरे यांना २२ मतेच मिळाली. यावरून काँग्रेसची सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेवर नामुष्की
शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली असावीत. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली.

राष्ट्रवादीची ती मतं कुठून?
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपाची, अशी चर्चा सुरू झाली.

भाजपाची मतं वाढली, सरकार स्थिर नाही स्पष्ट झाले
भाजपाचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. विधान परिषदेत चमत्काराचे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, पण भाजपानेच चमत्कार केला. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपाने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ १५२ असल्याने या दोन्ही निकालांवरून सरकार लगेचच कोसळेल असे नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भरभक्कम किंवा स्थिर नाही हे स्पष्ट झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply