राजीव गांधी हत्या प्रकरण : ‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकारार्ह,’ सर्व दोषींच्या सुटकेच्या आदेशानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या सहा जणांची सुटका होणार आहे. या प्रकरणातील एका दोषीची याआधीच १८ मे रोजी सुटका करण्यात आली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँगेसेचे नेते जयराम रमेश यांनी कोर्टाच्या या आदेशाला दुर्देवी आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

“राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अस्वीकारार्ह आणि अयोग्य आहे. काँग्रेस पक्ष या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त करत असून हा निकाल असमर्थनीय आहे,” असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन सह सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे. यामधील नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबतीत देण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणील सर्व सहा दोषींची सुटका करण्याचा आदेश दिला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply