पुणे : ‘दुसरीकडे गेलेल्यांचे गैरसमज दूर होतील’; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्वास

पुणे : सध्याचा राजकारणाचा प्रांत मोठा झाला आहे.  वेगवेगळय़ा पद्धतीने वाद केले जात असतात. मी एक भगवद्गीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल, असा विश्वास आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले. 

 डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते साडेचार हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.   बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून जल्लोष करतात, त्यांच्या निष्ठेबाबत बोलण्यासारखे नाही. काही लोकांनी आताच पळ काढलेला दिसत आहे. त्यांच्या मनात काय आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे.  सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य तेव्हा करावा. आम्ही सांगतो तो कायदा अशा पद्धतीने कोणी वागत असेल तर ते फार काळ टिकत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली. धाराशिव, संभाजीनगर नामांतर हे जनमानसात रुजलेले विषय आहेत. याबद्दल अल्पमत किंवा बहुमत याचा विचार करायचा नसतो. त्यामध्ये जनतेच्या मनाचा विचार करायचा असतो, असेही त्यांनी सांगितले.  राजकारणात जर तर या गोष्टीला काही अर्थ नसतो. जे अंत:करण आणि मनापासून आपले असतात, ते आपलेच असतात. त्यामुळे राजकारणात कोणाला काय करायचे, तो प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु ज्यांची दिशाभूल झाली आहे. अशा लोकांची हळूहळू फार मोठी संख्या होईल आणि त्याची सर्वाना जाणीव होईल, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply