पुणे : जी-२० बैठकीसाठी साठ चौकांचे सुशोभीकरण ; महापालिका घेणार बांधकाम व्यावसायिक, संस्थांची मदत

पुणे : जी-२० देशांच्या बैठकीसाठी शहरातील प्रमुख साठ चौकांचे सुशोभीकरण महापालिकेकडून केले जाणार आहे. खासगी बांधकाम व्यावासायिक आणि संस्थांची त्यासाठी मदत घेतली जाणार असून, डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातही बैठक घेण्यात आली.

जी-२० राष्ट्रसमूहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात परिषद होणार आहे. जी-२० परिषदेचे सदस्य शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. परिषदेसाठी २० देशांचे २०० हून अधिक प्रतिनिधी पुण्यात उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर सुशोभीकरणावर भर दिला आहे.

चौकांचे सुशोभीकरण करताना खासगी बांधकाम व्यावसायिक आणि संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित व्यावसायिकाची राहणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील ६० चौकांचे खासगी संस्था, बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही व्यावसायिक दोन, तीन किंवा पाच चौकांचेही सुशोभीकरण करणार आहेत. सुशोभीकरणाबरोबरच त्याच्या पुढील चार- पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीही संबंधित व्यावसायिक करतील. यामध्ये १८ बाय २४ इंच आकारात त्यांना स्वतःचे नाव वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावरही बैठकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेशकुमार सिन्हा, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव सोमकुवर, वैज्ञानिक अतिफ खान, आर.आर. तिवारी, व्यवस्थापक अनुज कौशल उपस्थित होते.

परिषदेच्यानिमित्ताने देशाचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सौरभ राव यांनी सांगितले. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भारत, महाराष्ट्र तसेच पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचनाही महापालिकेला करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply