चंद्रपूर: आठ वर्षात देशाची नाही, तर केवळ ‘गुजरात’ची उभारणी; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका म्हणाले “महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्य चिंताग्रस्त आहेत.”

चंद्रपूर: जनतेने नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मात्र, आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी गुजरात राष्ट्राची उभारणी केली. पूर्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मेट्रो शहरांमध्येच व्हायचे. आता ते केवळ गुजरातमध्येच होतात. देशातील उद्योजकांवर प्रचंड दबाव असल्याने आज उद्योग गुजरात या एकमेव राज्यात जात आहेत. मोदी व भाजपाकडून ‘एनर्जेटिक’ महाराष्ट्राला ‘डीएनर्जेटिक’ केले जात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या दबावामुळे असंख्य उद्योग कंपन्या देश सोडून जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

वंचित आघाडीच्या मेळाव्यासाठी ॲड. आंबेडकर येथे आले असता विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केवळ गुजरात राष्ट्राची उभारणी केली आहे. देशात काँग्रेस तथा इतर पक्षाचे सरकार असताना दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, कोलकता या मोठ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रम व्हायचे. मात्र, आता केवळ गुजरातमध्येच होतात. उद्योगांचेही तेच झाले आहे. राज्यात येणारे उद्योग गुजरात येथे पळवले जात आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे विर्भातील खनिज संपत्ती गुजरात येथे जात आहे. विदर्भात लोह खनिजासाठी प्रोसेसिंग युनिट सुरू करणे आवश्यक होते. मात्र, ते मुद्दाम सुरू केले नाही.

भाजपकडे आर्थिक धोरण नसल्यामुळे खनिजाचे महत्त्व कळत नाही. येत्या काळात विदर्भातील खनिज संपत्ती असलेल्या जिल्ह्यांची अवस्था कधीकाळी खनिज संपत्तीत अग्रस्थानी असलेल्या गोव्यासारखी होणार असेही आंबेडकर म्हणाले. जापानकडून एक लाख कोटीचे कर्ज घेवून उभारण्यात येत असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पही केवळ गुजरातसाठीच आहे. एकेकाळी ‘बिमारू’ राज्यात उद्योग लावण्यात येत होते. त्यामुळे तेथील गरिबी दूर होत होती. मात्र, आता केवळ गुजरात या एकाच राज्याचा विचार होत असल्याने दक्षिणेतील सर्व राज्य चिंताग्रस्त आहेत. राज्यकर्त्यांचे दबावामुळे असंख्य कंपन्या, उद्योज आज देश सोडून जात आहेत. केवळ खनिज संपत्तीच नाही तर राज्यातील पाणी देखील गुजरातला पाठवण्याची योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तयार केली गेली होती. आताही गोसीखुर्दचे पाणी इतर राज्यात जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही ब्लॅक मार्च असल्याचेही ते म्हणाले.

भाजप उमेदवारांची चौकशी करा

राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या सर्व निवडणुकांमध्ये झालेला पैशाचा वापर बघता ईडी व आयकर विभागाला पत्र लिहून भाजप उमेदवारांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

गडकरींनी विदर्भातील युवकांना फसवले

टाटा एअर बस प्रकल्प तथा इतर उद्योगांनाही नागपूर ही सर्वात सोयीस्कर जागा आहे. मात्र, राज्यातील व विदर्भातील उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहानच्या माध्यमातून युवकांना दोन लाख नोकऱ्या व अप्रत्यक्ष ३ लाख लोकांना इतर रोजगार देण्याची घोषणा केली होती. गडकरींचा मिहान प्रकल्प हा शुद्ध फसवणूक असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *