“ कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा आहे. म्हणून कामाख्या देवीच्या दर्शनाला चाललो” गुवाहाटी दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आज गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. “कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा आहे. म्हणून दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

गुवाहाटी दौऱ्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी निमंत्रण दिलं होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. “आम्ही हे सर्व राज्यासाठीच करतोय. यात आमचा काहीही अजेंडा नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातला जनतेला सुखी करण्याचं साकडं कामाख्या देवीकडे घालणार असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, दलित पँथरच्या सुखदेव सोनवणे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

गुवाहाटी दौऱ्यावरून शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला हे कोणाचा बळी द्यायला चालले आहेत?, असा खोचक सवाल अजित पवारांनी विचारला होता. त्यावर “महाराष्ट्राच्या विकासाच्या आळ येणाऱ्या विचारांचा बळी आम्ही कामाख्या देवीला देऊ”, असा टोला केसरकरांनी पवारांना लगावला आहे. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटी दौरा करत आहेत. शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार अनेक दिवस गुवाहाटीत वास्तव्यास होते. या दौऱ्यावरुन राज्यात राजकीय घमासानदेखील पाहायला मिळालं होतं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *