अश्विनचे पुनरागमन! ; विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी कोहली, बुमराला विश्रांती

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. परंतु विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि यजुर्वेद्र चहल या तारांकित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेत २९ जुलैपासून रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी गुरुवारी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर केएल राहुल आणि ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना या संघात स्थान देण्यात आले असले तरी त्यांची उपलब्धता त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले.

अश्विनचे आठ महिन्यांनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात अश्विनने तीन सामन्यांत सहा बळी मिळवले होते. मात्र, त्यानंतर त्याला भारतीय ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळू शकले नव्हते. परंतु आता त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त, आर्यलड आणि इंग्लंड दौऱ्यात खेळलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघातून वगळण्यात आले आहे.

* भारतीय संघ :  रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

‘ तंदुरुस्ती आधारे निवड : केएल राहुल, कुलदीप यादव.

मालिकेचे सामने

’ पहिला : २९ जुलै,     तारौबा (त्रिनिदाद)

’ दुसरा : १ ऑगस्ट,    बासेटेरे (सेंट किट्स)

’ तिसरा : २ ऑगस्ट,     बासेटेरे (सेंट किट्स)

’ चौथा : ६ ऑगस्ट,     लॉडरहिल (अमेरिका)

’ पाचवा : ७ ऑगस्ट,      लॉडरहिल (अमेरिका)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *