पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित

पुणे: आळंदी येथे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या मुक्कामाची अडचण निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीचा निर्णय घेत शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळांसह एकूण १० इमारती तात्पुरत्या आश्रयस्थळांसाठी अधिग्रहित केल्या आहेत. हा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जारी केला आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीवरील पूल आणि घाट परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे अनेक वारकऱ्यांना नियोजित मुक्कामस्थळी पोहोचणे कठीण झाले. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभी केली आहे.

अधिग्रहित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळांचा समावेश असून पुढील काही दिवस वारकऱ्यांच्या निवास, विश्रांती आणि आवश्यक सुविधांसाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. पूरस्थिती कायम असल्याने आपत्ती व्यवस्थापन, महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

प्रशासनाने संबंधित संस्थांना आदेशांचे तात्काळ पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वारकरी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात विशेष सतर्कता बाळगण्यात येत असून, पूरस्थितीवर सातत्याने नजर ठेवून आवश्यकतेनुसार आणखी उपाययोजना करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *