तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

 

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपल्याच पक्षात डावललं जातंय, असा आरोप अनेकदा मुंडे समर्थकांनी केलाय. अशातच विधान परिषदेत आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थक कार्यकर्ते आक्रम झालेले पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. त्या बुधवारी (१९ ऑक्टोबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

तुमच्या बाबतही चहावरून राजकारण झालेलं चहा आणि राजकारण यांचं समीकरण काय? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजकारण कसं असतं, त्यात सर्व गोष्टींचं व्यवस्थित मिश्रण पाहिजे. जसं चहामध्ये चहापत्ती, साखर, थोडी विलायची, थोडं सुंठ किंवा आद्रक टाकली पाहिजे. कोणी दालचिनी टाकतं. ते मिश्रण परफेक्ट झालं तर चहा परफेक्ट बनतो. एखादा दुसरा पदार्थ बनवणं सोपं, पण चहा बनवणं इतकं सोपं नाही. हेच राजकारण आणि चहातील साम्य आहे.”

चहात चहापावडर पडली तर तो कडवट होतो. तुमच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कोणी चहापत्ती जास्त टाकतंय का? या प्रश्नांवरही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. “मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा कसा प्यायचा. त्यामुळे मला थोडा स्ट्राँग चहा आवडतो. जे आपल्या वाट्याला येतं त्याची चव आपल्यासारखी बदलून घ्यावी लागते,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

“ताटात काही चांगलं पडलं नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचं तोंडी लावते. तिखट कमी असेल तर चटणी खाते. तसंच जीवनातही काही कमी पडलं , तर त्याची चव कशी व्यवस्थित करायची हे मला माहिती आहे,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *