Weather Report : राज्यात थंडीचा पारा आणखी वाढणार; तापमानात घसरण झाल्याने शाळांच्या वेळेत होणार बदल

मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली आहे. वातावरणात गारठा पसरल्याने परत सगळीकडे शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. मुंबईत गेले काही दिवस तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र आता पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. 

सोमवारी कुलाबा केंद्र येथील हवामान विभागाने किमान २२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्राने १९.४ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले आहे. पुढचे काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि कोकण वगळून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात जास्त प्रमाणात थंडी वाढणार आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्यात थंडी जास्त प्रमाणात नसेल. मात्र वातावरणातील गारवा कायम राहण्याची शक्यता आहे, असेही अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. किमान तापमान ८ ते १२ अंशांपर्यंत पोहचले आहे. तर खानदेशात बऱ्याच ठिकाणी तपमानात ४ ते ६ अंशाने घसरण झाली आहे. १० ते १५ जानेवारी या काळात तापनात २ ते ३ अंशाने हळूहळू रोज घट होणार आहे. यामुळे पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव अशा सर्व लगतच्या जिल्ह्यांत कडाक्याची थंडी जाणवू शकते.

थंडीची लाट वाढल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे. प्रशांत कनोजिया यांनी प्रशासनाला पत्राद्वारे ही विनंती केली होती. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिस्थिती तपासून आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत.थंडीचा कडाका असल्याने लहान मुलांना सर्दी, खोकला अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशात मुलांच्या तब्येतीकडे पाहून शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply