Raj Thackeray On BJP : भाजपला माझा सपोर्ट का?, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

Raj Thackeray On BJP : महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सपोर्ट का करत आहेत? यामागचे कारण सांगितले. त्याचसोबत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. 'जी गोष्टी योग्य ती योग्य. जी गोष्ट अयोग्य ती अयोग्य.', असे मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

राज ठाकरे यांनी या सभेदरम्यान सांगितले की, 'या देशामध्ये राज ठाकरे पहिला माणूस होता जो म्हणाला होता की मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. त्यांच्या पक्षातील कोणीच तोपर्यंत असे बोलले नव्हते. आपला एक स्वत:चा विचार असतो. त्यात माणसं बोलत असतात, स्वप्न सांगत असतात. प्रत्येकाला वाटते स्वप्न सत्यात उतरावे. २०१४ च्या निवडणुकीआधी मी मोदींची अनेक भाषणं ऐकली. पण २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर मला असे वाटले की, मी जे ऐकत होतो ते मला ५ वर्षांत दिसत नाही. काही तरी वेगळ्याच गोष्टी दिसतात. नोटाबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते. मी अजूनही सांगतो ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटलेल्या नाहीत.'

Pimpri Chinchwad : बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना भरधाव कारनं चिरडलं, युवकास अटक

२०१९ ला भाजचा विरोध केल्याच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितले की, 'उद्या कितीही संबंध चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या त्याचे स्वागत करणार. पण ज्या गोष्टी नाही पटणार त्याचा विरोध करणार. ज्याच्याशी संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. पण ज्यांच्यावर प्रेम असते, ज्यांच्यावर विश्वास असतो त्याला ज्यावेळी तडा जातो असे दिसायला लागते तर राग येतो आणि माझा राग टोकाचा आहे. मी महाराष्ट्रवर प्रेम करतो. मराठी माणसावर प्रेम करतो. पण जर मी एखाद्या माणसावर विश्वास टाकला तर त्याच्यावर टोकाचे प्रेम करतो. पण मला जर तशी गोष्ट दिसली नाही तर टोकाचा राग करतो आणि टोकाचा विरोध करतो. तो टोकाचा विरोध माझ्या २०१९ च्या 'लाव रे तो व्हिडीओ'मध्ये तुम्हाला दिसला असेल.'

राज ठाकरे यांनी मोदींच्या अनेक कामांचे कौतुक देखील केले आहे. त्याबद्दल ते म्हणाले की, 'पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घडल्या तेव्हा मी स्वागत केले. ३७० कलम रद्द झाले तेव्हा अभिनंदन करणारे पहिले ट्वीट माझे होते. गेल्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे स्वागत केले. एनआरसीच्या बाजूने मी मोर्चा काढला आहे. जी गोष्टी योग्य ती योग्य. जी गोष्ट अयोग्य ती अयोग्य. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम केले मी देखील केले. पण ज्यावेळी एखादा माणूस एका प्रांताचा विचार करतो हे मला नाही पटले.'

राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पण मोदींवर माझी व्यक्तिगत टीका नव्हती. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पीएम मोदींवर आणि भाजपवर ज्यापद्धतीने टीका करत आहेत तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होते. मला मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून मी विरोध नाही केला. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला.', असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

तसंच, 'आज हे विरोधात बोलतात. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्यासोबत का नाही आलात. त्यावेळी सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना. आज यांना या गोष्टी सूचत आहेत. याचे कारण तुमचा पक्ष फुटला, तुम्हाला सत्तेतून हाकलले म्हणून. तुमच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही या गोष्टी केल्या. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. तुमच्यासारखे मला काही पाहिजे होते म्हणून मी विरोध केला नाही.', अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *