Pune to Satara : पुणे– सातारा आता सुसाट जा, रेल्वेच्या दुहेरीकरणातील अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण

Pune to Satara railway double line completed : पुण्याहून साताऱ्याला आता रेल्वेने सुसाट जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेने पुणे– मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्याशिवाय पुणे आणि सातारा या मार्गावरील रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम १४५ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. पुणे – मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील सर्वाधिक कठीण अशा शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे.

मध्य रेल्वेने पुणे– मिरज यादरम्यान असणाऱ्या शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे 9.45 कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक मानला जातो. हा भाग डोंगराळ, अवघड वळणांचा भरलेला आणि बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे या सेक्शनचं दुहेरीकरण खूप आव्हानात्मक ठरलं. 17 जून 2025 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर हा सेक्शन सुरू करण्यात आला. या दुहेरीकरणासह पुणे – सातारा मार्गाचे 145 कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, एकूण 279 कि.मी. लांबीच्या पुणे – मिरज प्रकल्पातील 258 कि.मी. अंतर आता कार्यान्वित करण्यात आले आहे.

शिंदवणे – आंबळे सेक्शन पूर्ण करताना पुढील महत्त्वपूर्ण अडचणी यशस्वीरित्या पार करण्यात आल्या:

१४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधण्यात आला आहे.

१:१०० असा उतार असल्यामुळे कामासाठी अगदी अचूक योजना आणि बांधणी करावी लागली.

१३ भागांमध्ये विभागलेला एक मोठा पूल बांधला गेला, ज्यामध्ये सर्वात उंच खांब ४२ मीटर उंच आहे. हा पूल एका वर्षात पूर्ण झाला.

यात पाच मोठे पूल तयार करण्यात आले ज्यामध्ये विशेष प्रकारचे लोखंड व सिमेंटचे गर्डर वापरले गेले आहेत. यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा १८.३ मीटर उंच आहे.

३० लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केले गेले आहेत. यातील सर्वाधिक उंच भराव 35 मीटरचा आहे.

वीस लाख घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये 25 मीटर पर्यंत देखील खोदकाम करण्यात आलेले आहे.

२३ छोटे पूल या मार्गावर बांधले गेले.

यामध्ये 16 तीव्र वळणे आहेत यातील सहा अंशाचे वळण सर्वाधिक तीव्र आहे.

या प्रकल्पात डोंगर, खडक, उंच तटबंदी, खोल खोदकाम आणि मोठे पूल अशा विविध भौगोलिक आव्हाने पार करून दुहेरीकरणाचे काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात आलं. या सेक्शनचं दुहेरीकरण झाल्यामुळे रेल्वेच्या मार्गावरची गर्दी कमी होईल, गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल, जास्त गाड्या चालवता येतील आणि प्रवासी व मालगाड्यांची संख्या वाढवता येईल.

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *