Pune Rain : पावसापासून वाचण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहिले, अचानक वीज पडली अन्... पुण्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Pune : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील ५५ वर्षीय शेतकरी संजय जगन्नाथ जगताप यांचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जगताप यांच्या शेतात फ्लॉवर पिकाची काढणी सुरू होती. शेतामध्ये मजुरांसह कुटुंबातील सदस्य काम करत होते. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास संजय जगताप आपल्या मुलांना मोटरसायकलवरून शेतावर पोचवण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे ते रस्त्याच्या बाजूला थांबले.

पावसापासून बचाव व्हावा यासाठी संजय जगताप अंगावर प्लास्टिकचा कागद घेत रस्त्याच्या कडेला उभे राहिले. अचानक विजेच्या कडकडाटासह त्यांच्यावर वीज कोसळली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या धक्क्यामुळे रस्त्यावर सुमारे दीड फुटाचा खड्डा पडला. या दुर्घटनेत जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भाऊजी तसेच आई-वडील असा मोठा परिवार आहे. संजय यांच्या मृत्यूमुळे जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार अरुण शेलार आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वीज कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी वाऱ्याचा जोर वाढल्यास सुरक्षित आडोशाला थांबावे, झाडाखाली किंवा मोकळ्या जागी उभे राहू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

संजय जगताप यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे याच परिसरातील मगर मळा येथील ऊसतोड कामगारांच्या वस्तीजवळील एका नारळाच्या झाडावर कालच वीज कोसळली होती. या विजेमुळे झाडाला आग लागून झोपडीने पेट घेतला होता. त्यामध्ये दोन लहान मुलांना दुखापत झाली. सुदैवाने ते दोघेही बचावले असून सध्या त्यांच्यावर केडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply