Pune : गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झालेत अन् पुण्यात भावी खासदार म्हणुन ‘या’ नेत्याचे झळकले बॅनर्स; राष्ट्रवादीने लाजच काढली

Pune : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे दोन दिवसांपूर्वी दुखःद निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून गिरीश बापट आजारी होते. त्यांच्या निधनानंतर भाजपचा पुण्यातील बालेकिल्ला ढासळल्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. मात्र गिरीश बापट यांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर भाजप कोणाला संधी देणार, याबद्दल तर्क वितर्क लढवले जात असतानाच एका नेत्याचे चक्क भावी खासदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. 

भाजप नेत्याने लावले बॅनर...

गिरिश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या एका नेत्याची तर पुण्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. आज 1 एप्रिल रोजी मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावली आहेत. मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

हा प्रकार समोर आल्यानंतर या बॅनरवरुन जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. गिरिश बापट यांच्या निधनाच्या अवघ्या तीनच दिवसात त्यांच्या पदावर दावा ठोकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत्यूच्या तीन दिवसानंतर असा अतातायीपणा का करताय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. मात्र या बॅनरवरुन वाद सुरू झाल्यानंतर हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीची सडकून टीका...

दरम्यान, या बॅनरवरुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. "भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती.त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा," असा टोला त्यांनी ट्विट करत लगावला आहे...

त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही "१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा," असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *