Mann Ki Baat : 'देव ते देश, राम ते राष्ट्र', PM मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी साधला संवाद

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून यावर्षी पहिल्यांदा देशवासियांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आपण सर्व देशवासीयांनी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. ते म्हणाले, 'यावर्षी आपल्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयालाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या लोकशाहीचा हा सण भारताला लोकशाहीची जननी म्हणून अधिक बळकट करतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''इतके गहन विचारमंथन करून भारतीय संविधान,(भारताची घटना) तयार केली गेली आहे की तिला जिवंत दस्तावेज असे म्हणतात. या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये , तिसऱ्या प्रकरणात भारतातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे वर्णन करण्यात आले असून, हे खूपच लक्षणीय आहे की आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्या तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या चित्रांना स्थान दिले आहे. प्रभू रामाचे राज्य आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणेचा स्त्रोत होते आणि म्हणूनच 22 जानेवारीला अयोध्येत बोलताना मी देव ते देश, राम ते राष्ट्र; या विषयावर बोललो होतो.'' 

OBC Reservation : अध्यादेशावरून ओबीसी समाज सरकारवर नाराज? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. 

ते म्हणाले, यावेळची 26 जानेवारीची परेड खूपच अप्रतिम होती. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परेडमधील स्त्री शक्तीची, जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिस दलातील महिलांच्या तुकड्या कर्तव्य पथावर कदम ताल ( संचलन ) करू लागल्या, तेव्हा सर्वाना खूप अभिमान वाटला. महिलांचे घोष पथकासहित संचलन पाहून आणि त्यांचा जबरदस्त समन्वय पाहून देश-विदेशातील लोकांमध्ये जोश आणि उत्साह संचारला. या वेळी परेडमध्ये भाग घेतलेल्या 20 पथकांपैकी 11 पथके तर केवळ महिलांचीच होती.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण पाहिले की शोभायात्रेत / चित्ररथात देखील सर्व महिला कलाकार होत्या. जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यात सुमारे दीड हजार मुली सहभागी झाल्या होत्या. अनेक महिला कलाकार शंख, नादस्वरम आणि नगारा ही भारतीय संगीत वाद्ये वाजवत होत्या. डीआरडीओच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, भूमी , आकाश, सायबर आणि अवकाश या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचे रक्षण कसे करत आहे हे ह्या चित्ररथाच्या देखाव्यात सादर केले होते. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन 21व्या शतकातील भारत प्रगतीपथावर जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply