Devendra Fadanvis : 'नैतिकतेचा मुलामा चढवू नका..' सुप्रीम निकालानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचले

Maharashtra Political crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. शिंदे गटाने नियुक्त केलेला व्हिप बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांनी घ्यावेत असेही निर्देश दिले आहेत.

मात्र तरीही राज्यात शिंदेशाही कायम राहणार असल्याचेही न्यायालयाने म्हणले आहे. सत्ता संघर्षाच्या या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

राज्याच्या सत्ता संघर्षावरील बहुप्रतिक्षित निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी "सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे," असे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंना टोला...

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "मी नैतिकतेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे म्हणतात पण भाजपसोबत निवडून आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना तुमची नैतिकता कुठे गेली होती," असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी "तुमच्याकडे आकडे नाहीत, हरणार आहात, लोक तुम्हाला सोडून गेले. त्यामुळेच भितीपोटी राजीनामा दिला. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करू नये," अशा शब्दात त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला.

"उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरं त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचेही," देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply