INS विक्रांत: “ही मोठी कामगिरी पण…” युद्धनौकेवरुन जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करुन दिली ‘या’ नेत्यांची आठवण

भारतीय बनावटीची युद्धनौका INS विक्रांत आजपासून भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या युद्धनौकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. INS विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल झाली ही मोठी कामगिरी आहे. मात्र, या युद्धनौकेसंदर्भातील प्रक्रिया २२ वर्षांआधीच सुरू झाली होती. सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळानंतर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ही नौका कार्यान्वित झाली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. या युद्धनौकेसंदर्भात इतर सरकारांनी दाखवलेल्या सातत्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली नाही, असा आरोपही रमेश यांनी केला आहे.

INS विक्रांत कार्यान्वित करण्यासाठी परिश्रम घेणारे नौदल अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचं रमेश यांनी अभिनंदन केलं आहे. INS विक्रांत नौदलात दाखल करण्यासाठी २२ वर्ष लागली. त्यामुळे या यशाचं श्रेय या काळातील सर्व सरकारांना जातं, असेही रमेश यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

भारतीय नौदलातील INS विक्रांत ही एक सामर्थ्यशाली युद्धनौका आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. एका दमात १५ हजार किलोमीटरचा पल्ला गाठणं विक्रांतला शक्य आहे. एकाचवेळी तब्बल १४००हून जास्त नौदल अधिकारी आणि कर्मचारी या युद्धनौकेवर तैनात राहू शकतात. “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे.

INS विक्रांतचे वजन तब्बल ४० हजार टन एवढे आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *