हिंगोली; ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आमदार संतोष बांगर यांच्यासह शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडले

हिंगोली : ‘शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करत ‘बाळासाहेबांचीशिवसेना’चे आमदार संतोष बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयात गुरुवारी दुपारी तोडफोड केली. नंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याचे सांगत हा प्रकार कदापीही खपून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मुदतीनंतर काही तक्रारी आल्या. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे सांगत विमा कंपनीने नुकसानीच्या तक्रारी फेटाळून लावल्या. सुमारे ३० हजारपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे विमा कंपनीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी हिंगोलीतील पिकविमा कार्यालयातआपल्या सहकाऱ्यांसह जाऊन फोडतोड केली.

विशेष म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे. विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक शेतकरी अर्जावर आपली स्वाक्षरीच नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विमा कंपनीची बनवाबनवी उघड झाली, अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.

या प्रकारानंतर गुरुवारी आमदार संतोष बांगर, बाळासाहेब युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, पिंटू पतंगे, प्रकाश दराडे, गुड्डू बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी त्या कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सर्वेक्षणाचे अर्ज दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली. त्यानंतर आमदार बांगर यांनी जिल्हाधिकारी जितेद्र पापळकर यांचीही भेट घेऊन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया संदर्भात चर्चा केली.

खऱ्या अर्थाने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल या आशेवर वेळेत रकमा भरल्या. परंतु शेतावर न जाता परस्पर सर्वे करून अर्जावर बनावट स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा. तसेच विम्याची रक्कम भरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply