मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, आदित्य ठाकरेंचं महापालिका आयुक्तांना खळबळजनक पत्र

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर (AQI) खालावला आहे. त्यामुळे शहरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सर्व खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

श्वास घेणेही झाले कठीण

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण शहर प्रचंड धुके आणि धुळीच्या थराने झाकले गेले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा प्रदूषित वातावरणात कोणतेही शहर पर्यटकांना आकर्षित करू शकत नाही, नवीन गुंतवणूक आणू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकत नाही, असे त्यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख मागण्या काय?

  • वाढत्या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील सर्व खासगी बांधकामांवर किमान सात दिवसांची बंदी घालण्यात यावी.
  • स्वच्छ हवेच्या दृष्टीने आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागाच्या (Ward) स्थितीनुसार बांधकामांचे एक निश्चित वेळापत्रक तयार करावे.
  • गेल्या वर्षी बोरिवली परिसरात प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे तेथील बांधकामांना आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता संपूर्ण मुंबईत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यातून उडणारी धूळ प्रदूषणास मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या मागणीनंतर आता महापालिका प्रशासन बांधकामांबाबत काय नियमावली जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[embedded content]



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *