“महामार्गांवरील खड्डे तीन दिवसात बुजवले जातील”, नितीन गडकरींची घोषणा

देशातील महामार्गांवरील खड्ड्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसल्यास ते तीन दिवसात बुजवले जातील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवे अ‍ॅप तयार केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, खड्डे आढळल्यास ते तात्काळ दुरुस्त केले जातील, असे गडकरी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

सर्वसामान्यांवरील टोलचा भूर्दंड कमी करणार असल्याचेही नितीन गडकरी या मुलाखतीत म्हणाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा (ANPR) बसवण्यात येईल, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली होती. या कॅमेराने टिपलेल्या गाडीच्या नंबरप्लेटच्या आधारे बॅंक खात्यातून पैसे वजा होतील, अशी ही यंत्रणा असणार आहे. या यंत्रणेचा चाचणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. “आम्ही या योजनेचा चाचणी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, यात काही त्रुटी आहेत. जर वाहन चालकाने कॅमेरा चुकवण्याचा प्रयत्न केला किंवा बॅंक खात्यात पैसे नसेल, तर त्याबाबत काय शिक्षा असेल, यासंदर्भात आपल्याला कायद्यात सुधारणा कराव्या लागतील” असे गडकरी म्हणाले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *