मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चा आरक्षणासाठी आक्रमक; ४३ कार्यकर्त्यांनी लिहिली रक्ताने पत्रे

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने ५८ मोर्चे काढले. त्यानंतरही समाजाला न्याय मिळू शकला नाही. आता तर नवीन सरकार आले असून सरकारने तत्काळ समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. मोर्चातर्फे शनिवारी (ता.३०) ४३ तरुण कार्यकर्त्यांनी रक्ताने मुख्यमंत्री आरक्षण देणार का? असे पत्रात लिहिले आहे. हे पत्र रविवारी (ता.३१) मुख्यमंत्र्यांनी देणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली.

श्री. केरे म्हणाले, की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही महत्त्वाची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यभरातून मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाच्या एकूणच सर्व प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली.
 
विद्यार्थ्यांना महावितरण विभागामध्ये प्रलंबित असलेल्या नियुक्त्या तत्काळ कराव्या, प्रत्येक जिल्ह्यात सारथीचे उपकेंद्र सुरू करावे, सारथीसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, वसतिगृहाची तत्काळ उभारणी करावी, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी, एसईबीसी आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीत लागू केलेले ईडब्ल्यूएस आरक्षण मिळणार नाही त्यामुळे आता सुपरन्युमरी पद्धत वापरून या उमेदवारांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. किशोर शिरवत पाटील, मनोज मुरदारे पाटील, कृष्णा मनमाडे पाटील, महेश मोरे पाटील, योगेश कोटाळे पाटील, रमेश चावरे पाटील उपस्थित होते.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply