पुणे : नगर महामार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक बंद ; शिक्रापूर-चाकण मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात अवजड वाहनांना अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांना दिला आहे. प्रस्तावात केलेल्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे शहरातील वाहतूक कोंंडीतही भर पडली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक विभागाचे उप आयुक्तांना तसा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबतचे पत्र महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आले आहे. अवजड वाहनांमुळेच वाहतूक कोंडी होत आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून या पत्रात करण्यात आला आहे.

शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. तसेच बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply