“तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात धरून बाजूला लोटलं ”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विरोधातील विनयभंगाचे आरोप खोटे असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची जाहीर केलं. यानंतर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ‘तू इथं काय करतेस’ असं म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं, असा आरोप केला. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईल भाजपा प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

पीडित भाजपा महिला पदाधिकारी म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रम स्थळावरून परत जात होते तेव्हा मी त्यांना भेटायला जात होते. मी त्यांच्या पीएंनाही भेट करून देण्याविषयी सांगितलं. सगळेच त्या गाडीला चिकटून चालत होते, कारण मधून चाललं तर जागा मिळणार नाही. त्यामुळेच मी गाडीला चिकटून दरवाजाकडे जात होते. व्हिडीओतही ते दिसत आहे.”

“मी एकनाथ शिंदेंना भेटायला जात असताना समोरून आमदार जितेंद्र आव्हाड आले. स्थानिक आमदार असल्याने मी त्यांना पाहून स्मितहास्य केलं. तेव्हा त्यांनी ‘तू इथं काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं. त्यांनी मला धक्का देताना हा विचार केला नाही की, तिथं सर्व पुरुष होते आणि त्यांनी लोटल्यावर मी आजूबाजूच्या पुरुषांच्याच अंगावर गेले. जे घडलं ते सर्वांसमोर आहे,” असं या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकारानंतर मी डीसीपींकडे गेले. त्यांना सर्व सांगितलं. तसेच तो व्हिडीओही दाखवला. त्यांनी मला पोलीस स्टेशनला जाऊन सांगा असं सांगितलं. हात लावल्याने माझ्या मनात जी भावना तयार झाली ते मी जबाबात सांगितलं. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला. काही लोक म्हणतात असं होतं. मात्र, सर्वांनाच हे चालतं असं नाही.” “जो कायदा सर्वांसाठी आहे तो कायदा जितेंद्र आव्हाड यांनाही लागू व्हावा,” अशी मागणी पीडितेने केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *