“कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंची सत्तारांवर सडकून टीका, शिंदे-फडणवीसांना विचारला थेट सवाल

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर सडकून टीका केली आहे. “शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना कृषीमंत्र्यांना वेगळा कार्यक्रम करायला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसायचं असतं. मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप गेले नाहीत”, असा हललाबोल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. कृषीमंत्री राजीनामा देणार का? आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

“पावसाळी अधिवेशनात पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकासआघाडीनं केली होती. पण या घटनाबाह्य सरकारनं आमचं अद्यापपर्यंत ऐकलं नाही”, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरदेखील टीकास्र सोडलं आहे. “एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्र शिंदे सरकारला माफ करणार नाही” असे ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. याची दखल अद्याप सरकारने घेतली नसून हे दुर्देवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली. या ठिकाणी शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, नंदुरबार दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यांवरुन टोलेबाजी केली आहे. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. “सगळ्यांना मी कामाला लावलं आहे. काही लोक बांधावर जातात, ठीक आहे गेले पाहिजेत. शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनी पण…” असा खोचक टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply