“कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही”; राज ठाकरेंचं वक्तव्य

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अनेक राजकीय उलथापालथी आणि आत्ताच्या शिवसेना फुटीनंतर झालेलं सत्तांतर यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे. “आत्ताची राजकीय परिस्थिती पाहून कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही,” असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. तसेच महाराष्ट्रात काय चाललं आहे? असा सवाल करत त्यांनी आपण राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही, असंही नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले, “मला आत्ताची राजकीय स्थिती पाहून मला चुकीचा कॅरम फुटल्यावर जसं कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हे कळत नाही तसं वाटतंय. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. आत्ता लोकांना आपण मतदान कुणाला केलं होतं हेही कळत नसेल.”

“मतदान झालं, मतदानानंतर निकाल आले. निकाल लागल्यानंतर एक दिवस पहाटे शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस व  अजित पवार यांनी राज्यपालांकडून शपथ घेतली. मग ते फिस्कटलं आणि शरद पवार व उद्धव ठाकरेंची बैठक झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी युती झाली. त्याचं एक सरकार स्थापन झालं. आता त्यातून काही आमदार फुटले आणि ते भाजपाकडे गेले. आता भाजपाचा सत्तेत आलाय आणि मुख्यमंत्री जे फुटले त्यांचा झालाय,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही”

“महाराष्ट्रात काय चाललं आहे? आपण राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही. याचं कारण यांना लोकांच्या मतांची किंमत नाही,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

“भावनेच्या आहारी जाऊन लोक त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “लोक बाळासाहेब होते म्हणून भावनेच्या आहारी जाऊन त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात. मात्र, बाळासाहेब कुठे आहेत? या भावनांना काय अर्थ आहे का? दिवसेंदिवस आपण महाराष्ट्र मागे नेत आहोत याचा साधा विचारही मनात येत नाही.”

“लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?”

“जे आमदार आपण निवडून देतोय तो आमदार भलतीकडेच जातोय. तोच आमदार पैसे घेऊन आणखी तिसऱ्याकडे जातोय. काय चाललंय. लोकांनी फुकटचं उन्हात उभं राहून यांना मतदान करत राहायचं का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

“प्रादेशिक पक्षांना संपवणं हाच भाजपाचा अजेंडा”, शिवसेनेच्या आरोपावर राज ठाकरे म्हणाले…

राज ठाकरे म्हणाले, “पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सर्वांनी पाहिलं की असा कुणी संपवला ठरवून कुणी संपत नाही. तुम्ही हाराकिरी केली तर त्याला परमेश्वरही वाचवू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला मी मोठा व्हावा असं वाटतं. यात काहीच चुकीचं नाही. समोरचा संपावा आणि मला राज्य मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, समोरच्याने आपआपला विचार करायचा असतो. मी कसा वाढेन हा विचार केला पाहिजे.”

“तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं?”

“एखाद्याची रेष खोडण्यापेक्षा मी माझी रेषा ओढेल असं आपल्याकडे म्हणतात. मात्र, हा विचारच दिसत नाही. तुम्हीच आत्मघात करायचं ठरवलं तर समोरच्या पक्षाने काय करायचं? काहीच करू शकत नाही,” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *