“उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव दोन तुकडे केले आहेत ”; शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे चालवला आहे”

मुंबई : यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

“गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव दोन तुकडे केले आहेत. राजकारणात आता दोन गट पडले असले तरी, मनाची आणि विचारांची विभागवारी अडीच वर्षापूर्वीच झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह जात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची अंमलबजावणी केली का?,” असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिवसैनिकाची गर्दी शिवाजी पार्कवर होणार आहे, असा दावा केला जात आहे. याबाबत विचारले असता शहाजी बापू पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केलेली शिवसेना कडव्या शिवसैनिकाला त्यांची वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे चालवला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक बीकेसी मैदानावर येतील.”

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कटुता ठेऊ नये, असा सल्ला शिवसेना आणि शिंदे गटाला दिला आहे. त्यावर पाटील यांनी सांगितलं, “शिवसेना आणि भाजपा यांच्यात कायम कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. २०१४ साली शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादी भाजपासह सरकार स्थापन करत होती. तसेच, २०१९ साली भाजपा शिवसेना सरकार स्थापन होणार होते. मात्र, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना एकत्र घेत सरकार स्थापन केले. ते जनतेला आवडले नाही,” अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *