अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार; अस्लम शेख यांची घोषणा

मुंबई : परराज्यांतील मच्छीमार राज्यात येऊन मासेमारी करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर  करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. समुद्र आणि नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्रदूषणाची नियमावली आणखी कडक करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. मच्छीमारांचे प्रश्न सोडविणे आणि माशांच्या उत्पादनासंदर्भात तक्रारी मिळताच मत्स्य विभाग कार्यवाही करत असते. २०१९ मध्ये एक तक्रार आली होती; परंतु त्यात काही तथ्य आढळले नाही. २०२० मध्ये १९ तसेच २०२१ मध्ये १८ कंपन्यांना क्लोजअप नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती शेख यांनी उत्तरात दिली. शेकापचे सदस्य जयंत पाटील यांच्यासह रमेश पाटील, प्रसाद लाड, महादेव जानकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी कोकणातील समुद्राच्या वाढत्या जलप्रदूषणामुळे मत्स्य उत्पादनात घट झाल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री शेख यांनी सांगितले की, मच्छीमारीला कृषीचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असून त्याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्याने करण्यात येत आहे. माशांच्या उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहे. कोकण किनारपट्टीतील समुद्र आणि नद्यांच्या प्रदूषणाची वाढ रोखण्यासाठी मत्स्य विभाग आणि पर्यावरण विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला असल्याचेही शेख यांनी सांगितले.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *