पुण्यात सायबर पोलीस ठाण्यांची संख्या वाढविणार; नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ग्वाही

पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. सायबर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुण्यात एक स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे अस्तिवात आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आणखी सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी गृहविभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी सांगितले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपाचारिक संवाद साधला. या वेळी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे आदी उपस्थित होते. पुण्यातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. पुण्यात सायबर फसवणुकीच्या तक्रारी वाढत्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे शहरात सायबर गुन्हेविषयक तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. सायबर गुन्हे तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुंबईत सहा स्वतंत्र सायबर पोलीस ठाणी आहेत.

मुंबईतील लोकसंख्या विचारात घेऊन तेथे अन्य शहरांच्या तुलनेत सायबर पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गृहविभागाने राज्यात ४३ सायबर पोलीस ठाणी स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पुण्यात आणखी दोन सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्यासाठी गृहविभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद केले.सायबर पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी तंत्रकुशल असणे गरजेचे आहे. पोलिसांना सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई
शहरातील गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग तसेच हडपसर भागातील मांजरी परिसरात कोयता टोळींनी दहशत माजविण्याची घटना घडल्याने नागरिकांनी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याचे पत्रकारांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. गुन्हेगारीकडे वळवलेल्या अल्पवयीन मुलांवर बालगुन्हेगारी प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. गुंड टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी टोळ्यांवरील कारवाई यापुढील काळात सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

चोरट्यांच्या विरोधात विशेष मोहीम
पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने लांबविणे, नागरिकांचे मोबाइल हिसकावणे, लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील तपास पथके विशेष मोहिमेत सहभागी होणार आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात परराज्यातील तसेच बाहेरगावच्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या, त्यांच्या तक्रारी जाऊन त्वरित कार्यवाही (कम्युनिटी पोलिसिंग) करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुणे शहरात गेले नऊ वर्ष वास्तव्यास आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.-रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply