कोल्हापुरातील किटवाड धबधब्यात चार तरुणींच बुडून मृत्यू

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला. किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे किटवाड धबधब्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंदगड तालुक्यातील किटवाड येथे जलाशयाच्या शेजारी धबधबा आहे. तेथे महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बेळगाव पासून २० किलोमीटर अंतरावर असल्याने सीमाभागातील लोकही येथे नेहमीच हजेरी लावत असतात.

आज सकाळी बेळगाव येथील खंजीर गल्लीतील मुस्लिम समाजातील सुमारे ३० तरुणी किटवाड येथे पर्यटनसाठी आल्या होत्या. धबधब्याचे पाणी प्रवाहित होऊन तयार झालेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांनी स्नान करण्याचे ठरवले होते. पहिली तरुणी खड्ड्यात उतरल्यावर ती बुडू लागल्यावर दुसरीने तिला हात देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाच तरुणी खड्ड्यात बुडाल्या.

हा प्रकार पाहून बाकीच्या तरुणींनी आरडाओरडा केल्यानंतर किटवाड गावातील तरुण ,ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात उडी मारून बुडालेल्या पाचही तरुणींना वर काढले. बचाव कार्य सुरू असतानाच तरुणींचे नातेवाईक धबधब्याजवळ आले होते. त्यांनी बुडालेल्या तरुणींना बेळगाव येथील रुग्णालयात हलवले. त्यांचे नाव , तपशील समजू शकला नाही. पाच तरुणी बुडाल्याने इतरांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे उपस्थित तरुणींनी सांगितले. तर बचाव करण्यात विजय लाड, महेश हेबाळकर, आकाश पाटील या तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

दरम्यान करोना टाळेबंदी नंतर किटवाड धबधबा हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरले आहे. मात्र, तेथे सुरक्षेच्या बोजवारा उडाला आहे. सुरक्षेबाबत कोणतेही फलक नसल्याने पर्यटकांवर अनर्थ ओढवल्याच्या घटना आहेत. आजची घटना ही या सर्वावर कडी करणारी ठरली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply