Pune : पुणे शहरात उष्णतेची लाट तीव्र; पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढणार, IMD चा इशारा आणि महत्त्वाचे सल्ले

Pune : राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट तीव्र होत असताना, पुण्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ४० अंशांच्या आसपास राहिले असून, उपनगरांमध्ये ते ४१ अंशांपुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. पुढील दोन दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारनंतर बाहेर पडणे कठीण होत आहे. मंगळवारीही अशीच परिस्थिती होती. सकाळचा गारवा पूर्णपणे कमी झाला असून, नऊ वाजल्यानंतर ऊन झपाट्याने वाढत आहे. सरकारी सुट्टीमुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळल्याने दुपारी रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. संध्याकाळी ऊन कमी झाले तरी हवेत उकाडा कायम राहिला. मध्यवर्ती भागांच्या तुलनेत उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली असून, तापमानात २ ते ३ अंशांचा फरक नोंदवला गेला. पुढील दोन दिवसांत दिवसासोबतच रात्रीचाही उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

उष्णतेच्या वाढत्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांच्या संरक्षणासाठी तीन मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार, खाणकामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावर काम करणारे विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी आणि रिक्षाचालक यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पुरेशी विश्रांती, पाण्याची उपलब्धता, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा बळकट करणे यावर भर देण्यात आला आहे.

दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण कामगारांसाठी असून, उष्णतेचा ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये थंड विश्रांती केंद्रे, पुरेसा पाणीपुरवठा, योग्य वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेशी संबंधित आजारांची ओळख आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.

तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णतारोधक गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे घरांची उष्णतारोधक क्षमता वाढवणे, थंड छप्पर (कूल रूफ), हरित क्षेत्रांचा विकास आणि हवामान-संवेदनशील शहरी नियोजन यांचा समावेश करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *