Mumbai : हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यात केवळ महिला, लहान मुली, सामान्य जनताच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांनी रविवारी केली. काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. तर विरोधक केवळ राजकारण करीत असल्याचा पलटवार फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती संपूर्णत: ढासळल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्रालयाचा कारभार पाहणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तर महायुती सरकारने आता विविध योजनांची जाहिरात करण्यापेक्षा ‘तुमची सुरक्षा तुम्ही करा, सरकार जबाबदार नाही’ असे फलक जागोजागी लावावेत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सिद्दिकी यांच्या हत्येवरून सरकारला लक्ष्य केले. राज्याच्या राजधानीत अशा हत्या होणार असतील तर कायद्याचे राज्य आहे कुठे, असा सवाल ठाकरे यांनी केला. ‘‘सत्ताधारी पक्षाचा नेताच सुरक्षित नसेल, तर सरकार सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी करेल,’’ असा सवाल राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

Pune : बाणेर टेकडीवर पुन्हा लूट, फिरायला आलेल्या तरुणासह मैत्रिणीला मारहाण

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांनी एका गुन्ह्याचे नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लवकरच गजाआड करू, असे फडणवीस म्हणाले. तर या धक्कादायक घटनेचे राजकारण करण्यापासून विरोधकांनी स्वत:ला रोखावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. भाजपचे केंद्रीय नेते शहानवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनीही विरोधकांवर राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

अजित पवार गटाला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या २५ वर्षांत मुंबईत आपले अस्तित्व निर्माण करता आले नव्हते. पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी मुंबईत विशेष लक्ष घालत बाबा सिद्दिकी व त्यांच्या आमदार पुत्राला आपल्याकडे ओढले. यातून अल्पसंख्याकबहुल भागात पक्षाची ताकद वाढविण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न होता. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांना पक्षात विशेष महत्त्वही देण्यात आले होते. मात्र त्यांच्या हत्येमुळे पक्षाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. महिला, राजकारणी, सत्ताधारी सारेच असुरक्षित आहेत. राज्यकर्ते म्हणून काम करण्यात हे लायकीचे नाहीत. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे)

या घटनेमुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. याची दाहकता पचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा केवळ राजकीय धक्का नव्हे, तर आम्हा सर्वांचे व्यक्तिगत नुकसान आहे. मात्र विरोधकांनी घटनेचे राजकारण करू नये. – अजित पवार, उपमुख्यमंत्री



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply