ठाणे किल्ल्यातील कारागृह

इतिहासकाळात जितकी महत्त्वाची होती तितकीच आजही महत्त्वाची असलेली ठाणे शहरातील वास्तू कोणती? ती वास्तू आहे ठाणे कारागृह सन १७३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केलेली असतानाच सन १७३७ च्या मार्च महिन्यात मराठी सैन्याने ठाणे जिंकून घेतले. किल्ल्याचे अपुरे राहिलेले काम मराठ्यांनी पूर्ण केले आणि ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर पाच भक्कम बुरुजांचा किल्ला उभा राहिला. सन १७७४ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ठाणे जिंकून घेतले. तेव्हाच्या नोंदीनुसार या पंचकोनी किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी भक्कम असून त्यावर शंभरपेक्षा जास्त तोफा असल्याची माहिती मिळते. सन १८१६ मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना याच किल्ल्यात बंदिवान ठेवण्यात आले. ते बहुदा या किल्ल्यातील पहिले कैदी म्हणता येतील. मात्र त्यांनी अतिशय हुशारीने या कैदेतून पळ काढला. त्यामुळे या किल्ल्यातील कारागृहातून पळणारे पहिले कैदी म्हणूनही डेंगळे यांचे नाव घ्यावे लागते.

ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून सन १८३३ मध्ये याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले. सन १८४४ मध्ये जिल्हा न्यायाधीश तुरुंगाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना, कैद्यांनी त्यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सन १८७६ मध्ये ४ लाख ८ हजार रुपये खर्च करून तुरुंगाचा कायापालट करण्यात आला. किल्ल्याच्या पश्चिम द्वाराजवळ अधीक्षकाचे निवासस्थान तयार करण्यात आले. किल्ल्यात स्वतंत्रपणे महिला बराक, रुग्णालय तयार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे राघोजीराव भांगरे यांना याच कारागृहात २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आले. नोव्हेंबर १८७९ ते जून १८८० या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. १९०९ मध्ये गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश न्यायालयाने काळ्या पाण्याची (अंदमान) शिक्षा ठोठावली. अंदमानला पाठवण्याआधी बाबारावांना ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. बाबारावांवरील अन्यायाचा निषेध म्हणून अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायक देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या तिघांना ११ एप्रिल १९१० रोजी ठाण्याच्याच तुरुंगात फाशी देण्यात आली. ठाण्याच्या तुरुंगात या हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुढे स्वातंत्र्य आंदोलन ऐन भरात आले तेव्हा ठाण्याचे किल्ला कारागृह राजबंद्यांनी खच्चून भरले. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी ठाण्यात 'राजबंदी सेवा समिती' स्थापन करण्यात आली. या काळात बाळासाहेब खेर, एस. एम. जोशी, केशव गोरे, माधव लिमये, द. म. सुतार, नाथा ताम्हाणे यांनी या तुरुंगात कारावास भोगला. १९४२च्या चळवळीत महिलांच्या बराकीत जागा नसतानाही महिलांना डांबण्यात आले, तेव्हा ३० महिलांनी बैठा सत्याग्रह करून तुरुंग प्रशासनाला नमवले होते. स्वातंत्र्यानंतरही आणीबाणीविरोधी आंदोलनात ठाणे कारागृहात राजबंद्यांना ठेवण्यात आले होते. संजय दत्त, हर्षद मेहता असे कैदीही या कारागृहाने पाहिले आहेत. मुळातला ठाण्याचा संरक्षक किल्ला जो स्वातंत्रसैनिकांच्या वास्तव्याने पावन झाला तो आज मात्र दरोडेखोर, खुनी आणि इतर गुन्हेगारांची बंदिशाळा बनला आहे. तिथे ठाण्याच्या स्वातंत्र्य चळवळीची स्मृती जागवणारे संग्रहालय व्हायला हवे, अशी अपेक्षा ठाणेकरांकडून व्यक्त केली जाते.

कसे जाल?

सर्वसामान्य नागरिकांना ठाण्याच्या पश्चिम भागातील हे कारागृह आतून बघता येत नाही. कोर्ट नाक्यावरून कळव्याकडे जाताना ठाणे कारागृहाचे प्रवेशद्वार दिसते. त्याची भक्कम तटबंदी आजही तो किल्ला असल्याची साक्ष देते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply