बंगळूर : कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वीजसंकट

बंगळूर : कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. केपीटीसीएलच्या अधिकृत माहितीनुसार बुधवारी आरटीपीएसच्या (रायचूर) सहाव्या व सातव्या केंद्रासह एकूण चार केंद्र कोळशाच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आले होते. परिणामी वीजनिर्मिती कमी होत आहे. तरीही सरकारतर्फे अधिकृत वीज कपातीची घोषणा झालेली नाही. मात्र राज्यात ठिकठिकाणी अघोषित वीज कपात सुरु आहे. गेल्या १६ एप्रिलपासून राज्यात कोळशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बुधवारीही काही प्रमाणात पुरवठा झाला तरी तूट कायम आहे. परिणामी रायचुरातील चार युनिट्स बंद करण्यात आले आहेत. रायचूर इलेक्ट्रिक पॉवर प्लँटचे सहावे आणि सातवे केंद्र बुधवारी कोळशाच्या कमतरतेमुळे बंद पडले.

गुरुवारी राज्यात सरासरी १३ हजार ५०० ते १४ हजार मेगावॅट विजेचा वापर होणाऱ्या कर्नाटकात कमाल १० हजार ४८४ आणि किमान सहा हजार ५६५ मेगावॉट वीज पुरवठा झाला. सहा हजार २२० मेगावॉट औष्णिक वीज निर्मितीची क्षमता असलेल्या असलेल्या कर्नाटकात १५ केंद्रापैकी बुधवारी केवळ सात केंद्रच (४ केंद्र आधीच बंद) कार्यरत होते. यातून केवळ एक हजार ७७४ मेगावॉट औष्णिक वीज पुरवठा झाला. वीज निर्मितीसाठी कोळशावर अवलंबून असलेल्या राज्यांच्या यादीत कर्नाटक शेवटच्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड ही सर्वाधिक कोळशावर अवलंबून असलेली राज्ये आहेत, तर सर्वात कमी कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात आहेत. एकूण ३१,२०० मेगावॉट क्षमतेपैकी १५,४०४ मेगावॉट वीज उत्पादन होते. कर्नाटक ३४ टक्के कोळशावर अवलंबून आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बंगळूर आणि इतर भागातील उद्योग, घरगुती ग्राहक वीज खंडित झाल्याच्या तक्रारी करत आहेत.

एफकेसीसीआयचे अध्यक्ष आय. एस. प्रसाद म्हणाले की, सध्या उद्योगांमध्ये वीज कपात झालेली नाही. परंतु ट्रान्समिशन लाईन देखभालीच्या कामामुळे राज्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित होत आहे.

अधिकृतपणे वीज कपातीची घोषणा केली जात नसली तरी अनियोजित वीज कपात हे एक नियमित झालेले आहे. राज्यात विजेची कमतरता नाही, परंतु वीज वितरण एजन्सीच्या तांत्रिक ट्रान्समिशन त्रुटींमुळे कपात झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply