मुक्तछंद:काळोखभरली रात्र, सोसाट्याचं वादळ आणि मिणमिणणारी पणती; वाचा कवयित्री मानसी वैद्य यांचा कॉलम…!

अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट! दरवर्षी एक तरी सहकुटुंब ट्रिप व्हायचीच, तशी त्याही वर्षी आमची ट्रिप माहूर, शेगाव अशी निघाली होती. घरी देवीची उपासना असल्यामुळं शक्य होईल तेव्हा जाणं, येणं होतंच. क्रुझर आणि जाता येता जवळपास 700 किलोमीटरची रोड ट्रिप त्यामुळे आम्ही भावंडं खुश होतो. नांदेडला चहा घेतला आणि वाटलं झालं, अंधाराच्या आत गडापाशी पोहोचू! गाडीत बसता बसता बहीण म्हणाली, "तशी आजच मी एक स्टोरी वाचली फेसबुक वर. एक कुटुंब असंच कुठेसं प्रवासाला निघालं होतं. अंधार होता होता त्यांचा मॅप चुकला. तिथं भरपूर जंगल होतं. गुगल मॅप रस्ता दाखवत तर होतं, पण अंतर कमीच होत नव्हतं. त्यांना वाट मिळतही नव्हती आणि कुठे चाललोय ते कळतही नव्हतं. शेवटी कंटाळून मधेच गाडी उभी केली आणि बसून राहिले. पहाट होता होता लक्षात आलं फिरता फिरता पुन्हा सुरुवातीच्याच ठिकाणी पोहोचलेत. त्यांना चकवा लागला होता!" तिने सहज सांगितलेली गोष्ट ऐकून "काहीही", "बापरे! केवढं थ्रिल!" असे उद्गार करत आम्ही भावंडं गाडीत बसलो. आजी मात्र हे ऐकून म्हणाली, "दादा, दिवसा उजेडीच पोहोचव रे!" मजा, गप्पा, गाणी अशा सगळ्यात दोन एक तास गेले. आजीची चलबिचल सुरू होती. एव्हाना पोहोचायला हवं होतं. आणखी एक तास उलटला तरी रस्ता काही संपेचना! अंधार पडायला लागला. भाऊ मजेत म्हणाला, "माई तू गोष्ट काय सांगितलीस, आपल्यालाच तर चकवा नाही लागला नं?" आम्ही हसण्यावारी नेलं खरं, पण आमच्याही मनात ही शंकेची पाल चुकचुकली होतीच. अंधार गडद होत गेला. दुतर्फा भरपूर झाडी असलेल्या रस्त्यावर एव्हाना इतर वाहनंही दिसत नव्हती. कितीतरी वेळ आपली आमची एकच गाडी धावत होती. हळूहळू सगळ्यांनाच भीती वाटायला लागली. मोठ्यांना भीती वाटली तरी दाखवता थोडीच येते! आम्हा भावंडांच्या कल्पनाशक्तीला मात्र ऊत आला होता. पाहता पाहता जिथे दोन तासात पोहोचावं तिथे आम्ही चार तास होऊनही पोहोचलो नव्हतो. रेंजअभावी मॅप उपयोगीच पडत नव्हतं. शेवटी उगाच फिरत राहण्या अर्थ नाही म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि साधारण अर्ध्या तासात आम्हाला एका गाडीचा आवाज आला. एक स्विफ्ट डिझायर आमच्या शेजारून पुढे गेली. झालं, आम्ही क्षणाचाही उशीर न करता कसे कोण जाणे त्या गाडीच्या मागे निघालो. थोड्याच वेळात मॅपची रेंज आली आणि आमच्या जीवात जीव! एका वळणाशी मग ती स्विफ्ट वळली आणि दिसेनाशी झाली. आम्ही टर्न राईट आफ्टर 500 मीटर्स ही सूचना ऐकून पुढे आलो. एक तासाभरात माहूर मधे होतो! जे दोन तासात होईल असं वाटलं होतं तिथे पोहोचायला तब्बल सहा तास गेले! खाली उतरल्या उतरल्या आजी म्हणाली, "देवीमाते, आणलंस बाई सुखरूप!" आम्ही काही म्हटलं नाही, पण सगळ्यांच्या मनात अगदी हेच होतं! खरंतर आज इतक्या वर्षांनी हा प्रसंग आठवतो तेव्हा वाटतं, त्या काही तासात किती भीती होती मनात, केवढ्या शंका होत्या. आपल्याला चकवा लागल्याची जवळपास खात्री होती! गाडी बिघडणं, पेट्रोल संपणं, अशा किती शक्यता डोक्यात पिंगा घालत होत्या. पण कुठंतरी मन म्हणत होतं, काही ना काही मार्ग नक्की निघेल. ती स्विफ्ट पाहिल्यावर पहिला विचार होता, 'कोण माणूस धावून आला देवासारखा'. त्या अंधाराल्या रस्त्यांवर आमच्या पुढे धावणाऱ्या त्या गाडीचे लाईट किती आश्वासक वाटले होते! वाटतं आम्ही त्या चकव्यापासून वाचू शकलो. कारण कुठेतरी, सगळ्या भीतीपलीकडेही मनाला पक्कं ठाऊक होतं, 'देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपण इथून बाहेर पडू शकतो'. भवताल जेव्हा अस्वस्थ करणारं असतं, जागतिक स्तरावरच्या घडामोडींचे पडसाद आपल्या आसपास कुठे कुठे उमटताना दिसतात तेव्हा मग मनावर मळभ येणं साहजिकच आहे. उज्ज्वल भविष्याची आणि कधी कधी वर्तमानतल्या घटनांमुळे आजचीसुद्धा मनभर पसरत जाणारी काळजी असतेच, पण या सगळ्या चक्रव्यूहात अडकून, शंकांच्या जंजाळात आपल्याला चकवा लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हा छोटासा प्रसंग जेव्हा जेव्हा मला आठवतो तेव्हा वाटतं आपल्या स्वतःपुरत्या कितीतरी गोष्टी ह्या आपल्या मनातच सुरू होतात नि मनातच संपतात. एक दिवस सगळं पूर्ववत नि चांगलं होईल हा विश्वास जर आपण मनात बाळगून असलो तर सगळ्या जटिल शंका दूर होतील आणि आपणही आनंदी राहू शकू! यावरच चार ओळी लिहिल्या होत्या... काळोखभरली रात्र, सोसाट्याचं वादळ प्रत्येकात सुरू असतं कधी ना कधी.. पण मग प्रत्येकानं पाहावं एकदा दूरवर, दिसेल एकतरी मिणमिणणारी पणती. तिचं असणं जाणीव करून देत राहील, अंधारापुढल्या प्रकाशाच्या अटळ अस्तित्वाची! संबंधित कॉलमचे इतर भाग मुक्तछंद:जयश्री आलूरकरांच्या कथासंग्रहातले माणूसपणाचे झरे; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मुक्तछंद:मामाचा गाव, चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका अन् पिंपळाचा पार; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये धुंद नाती गंधावणारी! मुक्तछंद:सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर, पण पाहतो का आपण?; वाचा मानसी वैद्य यांचा हुरहुर लावणारा कॉलम! मुक्तछंद:कविता न सुचलेले दिवस, उजळण्यामागचं जळणं आणि दोन कोवळी पानं फुटावित असं दान मागणारं दासूंचं 'तथापि'...! मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मानसी वैद्य यांचा कॉलम:जग जरी इतकं मोठं, हसू त्यात मावणार नाही...'मुक्तछंद' हे नवंकोरं सदर, वाचायला विसरू नका!

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *